पीडीइएचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल आकुर्डीमध्ये गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे आकुर्डी( ता.१४)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल आकुर्डीमध्ये गणेशोत्सव चिमुकल्यांच्या सहभागाने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसह मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. उत्सवाची तयारी पंधरा दिवस अगोदरच सुरू झाली होती. यासाठी विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी स्वहस्ते श्री गणेशाची शाडू मातीपासून अतिशय सुबक व रेखीव मूर्ती बनवली होती व याच मूर्तीची प्रतिष्ठापना पारंपारिक पद्धतीने करण्यात आली.
यावर्षीचे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे प्राचार्या प्रिती दबडे यांच्या संकल्पनेतील सामाजिक संदेश देणाऱ्या नारी सबलीकरणाचा देखावा. अतिशय संवेदनशील विषय कलात्मकतेने मांडण्यात आला होता.
सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता नारी ही फक्त सहनशील नसून तिच्या अलंकारातच तिची शक्ती सामावलेली आहे, असा संदेश व समाजप्रबोधन करण्यासाठी हा विषय मांडण्यात आला. स्त्री शक्ती आणि स्त्रीमध्ये असणारे विविध गुण याचे परिपूर्ण दर्शन दाखवणारी चित्रे ही प्रदर्शित करण्यात आली होती. शालेय मुलींवर होणारे अत्याचार हा आजच्या परिस्थितीत गहन प्रश्न आहे. यासाठी आत्तापासूनच शालेय मुलींना त्यांच्यातील शक्तीची जाणीव झाली पाहिजे, ज्यामुळे कोणताही अत्याचार सहन न करण्याची वृत्ती त्यांच्यात जोपासली जाईल, या नारीशक्तीच्या संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थिनी व पालकांपर्यंत पोहोचवण्यात आला. याबद्दल पालकांनी शाळेचे विशेष कौतुक केले. शालेय मुलींना 'चांगला स्पर्श' व 'वाईट स्पर्श' याबद्दल शिक्षकांनी विविध प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विविध पर्यावरणपूरक उपक्रम घेण्यात आले. ज्यामध्ये गणपती बाप्पाच्या छोट्या प्लायवूडवरील प्रतिमेची सजावट करणे, कोलाजच्या सहाय्याने गणपतीचे चित्र बनवणे, बाप्पाचे चित्र काढणे व आकर्षक पद्धतीने रंगविणे , बाप्पाच्या सजावटीसाठी टाकाऊपासून टिकाऊ साहित्य बनवणे, पताका बनवणे, पर्यावरणपूरक व्हिडिओ बनवणे इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विशेष संधी देण्यात आली. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे सादरीकरण केले. गणपती विसर्जन सहाव्या दिवशी पारंपारिक पद्धतीने शाळेच्या प्रांगणात एका छोट्या हौदात करण्यात आले. यामध्येही शाळेने पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व जपले.माती विरघळलेले पाणी झाडांना घालण्यात आले.
Comments
Post a Comment